Ravindra Ingle Chavarekar : नेपथ्यापासून ते प्रकाशयोजना, संगीत, रंग आणि वेशभूषा अशा विविध कलांचा आधार घेऊन सादर केली जाणारी नाट्यकला ही अत्यंत जोखमीची बाब आहे. त्यामुळे नाट्य सादरीकरण हे एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागते. ज्या कलाकृतीचा प्रवास हा जाणिवेतून नेणिवेकडे जाणारा असतो, ती कलाकृती व त्यातील विचार चिरंतर टिकणारे असतात, असे मत संशोधक साहित्यिक तथा नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांनी व्यक्त केले.

बुलढाणा : नेपथ्यापासून ते प्रकाशयोजना, संगीत, रंग आणि वेशभूषा अशा विविध कलांचा आधार घेऊन सादर केली जाणारी नाट्यकला ही अत्यंत जोखमीची बाब आहे. त्यामुळे नाट्य सादरीकरण हे एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागते. ज्या कलाकृतीचा प्रवास हा जाणिवेतून नेणिवेकडे जाणारा असतो, ती कलाकृती व त्यातील विचार चिरंतर टिकणारे असतात, असे मत संशोधक साहित्यिक तथा नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांनी व्यक्त केले.
माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने समर्थ एज्युकेशनच्या सभागृहात १७ सप्टेंबर रोजी आयोजित नाट्यसंवाद व सत्कार समारंभात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उर्दू गझलकार डॉ. गणेश गायकवाड होते. यावेळी इंजि. गणेश बंगाळे व नाट्यकर्मी शशिकांत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय सोनोने, आनंद संचेती, लक्ष्मीकांत गोंदकर व पराग काचकुरे यांनी उपस्थितांचे सन्मानचिन्ह व पुष्प देऊन स्वागत केले. मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेतर्फे आयोजित स्पर्धात्मक साहित्य पुरस्कार स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल ‘मी काहीही विसरलेलो नाही’ या नाट्यपुस्तकाचे लेखक शशिकांत इंगळे तसेच राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अकोला केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या ‘डोळा नसलेला अर्जुन’ या नाटकाच्या संपूर्ण संघाचा माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नामदेव पायरीतील कलावंतांना मुख्यमंत्री चषक व अटल करंडक स्पर्धेत विजेते ठरल्याबद्दलची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना रवींद्र इंगळे चावरेकर यांनी सत्ता, व्यवस्था, कला व पुरस्कार या विषयांवर आपले विचार मांडले तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
नाट्यकला मनाला प्रसन्नता व ऊर्जा देते – डॉ. गणेश गायकवाड
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. गणेश गायकवाड म्हणाले की, आपल्या अवतीभवती दुःखी, कष्टी, रोगी तसेच मत्सर, हेवेदावे, दंभ व गर्वाने ग्रस्त लोक आढळतात. मात्र नाट्यकला जोपासणाऱ्या लोकांमध्ये आल्यावर वेगळ्याच जगात आल्याचा अनुभव येतो. नाट्यकला मनाला प्रसन्न करणारी व ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे ‘नामदेव पायरी’, ‘डोळा नसलेला अर्जुन’ आणि ‘मी काहीही विसरलेलो नाही’ या तिन्ही नाटकांचे प्रयोग बुलढाण्यात घेण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी विविध गझलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
सत्काराला उत्तर देताना शशिकांत इंगळे यांनी अलीकडे नाट्यसृष्टीला विविध पुरस्कार, सन्मान व गौरव मिळत असल्याने जबाबदारी वाढली असून काळानुरूप नाट्यकलेतील नवे तंत्र आत्मसात करण्याची गरज असल्याचे नमूद केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी इंजि. गणेश बंगाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद दामले यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी अहेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत गोंदकर यांनी केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे, सारंग महाजन, अरविंद पवार, विनय शुक्ल, योगेश बांगडभट्टी, तुषार काचकुरे, जयंत दलाल, आनंद संचेती, पंजाबराव आखाडे, प्रा. डॉ. स्वप्नील दांदडे, प्रा. शैलेश वारे, संतोष पाटील, गणेश राणे, विलास मानवतकर, विकी चव्हाण, शुभम सोरमारे, धनंजय बोरकर, डॉ. जयेश चौधरी, अभिलाष चौबे, भारती बऱ्हाटे, गुड्डू सय्यद, सचिन अवसरमोल तसेच बाल कलावंत सार्थक बऱ्हाटे यांच्यासह नाट्यकर्मी बहुसंख्येने उपस्थित होते.

