Amol Gaikwad : आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना तरुण पिढी वेगाने व्यसनाधीनतेकडे झुकत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. पालकांनी वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढीवर होतील, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिला. देऊळगाव राजा येथील उपविभागीय कार्यालयात लोकमतशी बोलताना त्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांच्या दैनंदिन सवयी, मोबाईल वापर आणि वर्तनावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

पालकांनी वेळीच सतर्क राहून मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना तरुण पिढी वेगाने व्यसनाधीनतेकडे झुकत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. पालकांनी वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढीवर होतील, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिला. देऊळगाव राजा येथील उपविभागीय कार्यालयात लोकमतशी बोलताना त्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांच्या दैनंदिन सवयी, मोबाईल वापर आणि वर्तनावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
मोबाईल, रिल्स आणि अश्लीलतेचा तरुणाईवर विपरीत परिणाम
अमोल गायकवाड म्हणाले की, विज्ञानयुगात नवनवीन तंत्रज्ञान, बदलते अभ्यासक्रम, मोबाईलचे वाढते व्यसन, सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडिओ गेम्स तसेच चित्रपटांमधील वाढती अश्लीलता याचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर तरुणांकडून होत आहे. यातूनच व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती व चुकीच्या फॅशनचा प्रभाव वाढत असून हे समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे. वेळेत बंधन घातले नाही, तर भविष्यात परिस्थिती भयावह होऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तरुणाईच्या व्यसनाधीनतेस पालकही जबाबदार
पालकांनी आपल्या पाल्यांची शाळा-महाविद्यालयीन दिनचर्या, मित्रपरिवार व ऑनलाईन वर्तन याकडे लक्ष दिल्यास चुकीच्या मार्गावर जाण्यापासून त्यांना रोखता येईल. तरुणाईच्या व्यसनाधीनतेस पालकही काही अंशी जबाबदार असल्याचे प्रतिपादन अमोल गायकवाड यांनी केले.
लवकरच ‘दामिनी पथक’ स्थापन करणार – उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम
पश्चिम विदर्भातील देऊळगाव राजा हे शिक्षणाचे माहेरघर असून मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शहरात स्पर्धा परीक्षांची अनेक केंद्रे असून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी मैदानावर जाणाऱ्या विद्यार्थिनींना काही ठिकाणी टवाळखोरांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.
यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने यावर बऱ्याच प्रमाणात आळा घातला असून, कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थिनींनी थेट पोलीस विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी लवकरच ‘दामिनी पथक’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनीही विविध उपाययोजनांबाबत वरिष्ठांकडे सूचना केल्या असून, यावर निश्चित कार्यवाही केली जाईल, असे अमोल गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुळे, अमोल तिडके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका शांततेत पार पडल्याप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही शांततेत पार पडाव्यात, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियामुळे बाल गुन्हेगारीत वाढ
गायकवाड म्हणाले की, सध्याच्या ‘फास्टर’ युगात सोशल मीडियाचा प्रभाव तरुणाईवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. रिल्स व व्हिडिओंच्या प्रभावामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. शांतताप्रिय जिल्हा म्हणून बुलढाण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी सर्व सुज्ञ नागरिकांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ताण-तणाव निवारण शिबिर
अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी सांगितले की, अनेक वर्षे सेवेत असलेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक असतो. त्यामुळे लवकरच संपूर्ण जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ताण-तणाव निवारण शिबिरांचे आयोजन करून त्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

