Deepak Borhade : धनगर समाजाला घटनात्मक हक्क असलेले आरक्षण तात्काळ लागू करावे, या न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देणारे मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याचा गंभीर आरोप देऊळगाव मही येथील धनगर समाज बांधवांनी केला आहे. या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा दाबला गेला असून, ही हुकूमशाही प्रवृत्ती असल्याचा आरोप करत समाजाच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

देऊळगाव मही : धनगर समाजाला घटनात्मक हक्क असलेले आरक्षण तात्काळ लागू करावे, या न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देणारे मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याचा गंभीर आरोप देऊळगाव मही येथील धनगर समाज बांधवांनी केला आहे. या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा दाबला गेला असून, ही हुकूमशाही प्रवृत्ती असल्याचा आरोप करत समाजाच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लाखो धनगर समाज बांधव मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत होते. हे आंदोलन पूर्णतः शांततामय व लोकशाही मार्गाने होणार असताना, शासनाने भीतीपोटी थेट अटक करून दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे सरकारच्या हुकूमशाही मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.
दीपक बोऱ्हाडे यांची अटक पूर्णपणे असंवैधानिक असल्याचा दावा करत, त्यांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा थेट इशारा देण्यात आला आहे. या निषेध आंदोलनावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, देऊळगाव मही ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, भगवान जोशी, अमोल गुरव, कैलास देढे, अभिजित शिंगणे, सतीश म्हस्के, कारभारी देढे, किशोर खंडागळे, योगेश खंडागळे, राजू बकाल, शंकर डोळझाके, अनिल वैद्य, विशाल शेळके, आदित्य चोपडे, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

