Bhujpalsingh Rajput : देशभरात पवित्र मानली जाणारी ‘नर्मदा परिक्रमा’ पायी पूर्ण करून परतलेल्या येथील पिल्लूसिंग ऊर्फ भुजपालसिंग भिमसिंग राजपूत यांचे साखरखेर्डा गावात नागरिकांनी उत्स्फूर्त, जल्लोषात व भावपूर्ण स्वागत केले. गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पाद्यपूजा, बँड-बाजे व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.

७९ दिवसांत ३६०० किलोमीटरचा पायी प्रवास
साखरखेर्डा : देशभरात पवित्र मानली जाणारी ‘नर्मदा परिक्रमा’ पायी पूर्ण करून परतलेल्या येथील पिल्लूसिंग ऊर्फ भुजपालसिंग भिमसिंग राजपूत यांचे साखरखेर्डा गावात नागरिकांनी उत्स्फूर्त, जल्लोषात व भावपूर्ण स्वागत केले. गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पाद्यपूजा, बँड-बाजे व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.
भुजपालसिंग हे मूळचे जवळील गोरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील असून सध्या साखरखेर्डा येथील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, सुना व नातू असा मोठा परिवार आहे. ते दरवर्षी पंढरपूरच्या पायी दिंडीत सहभागी होऊन विठ्ठल-माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात. अनेक दिवसांपासून त्यांना नर्मदा परिक्रमेची तीव्र ओढ होती.
यावर्षी त्यांनी शेतीतील खरीप हंगामाची पेरणी करून सर्व मशागतीची कामे आटोपली आणि दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी साखरखेर्डा येथून नर्मदा परिक्रमेसाठी प्रस्थान केले. त्याच दिवशी शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रेल्वेने रात्री सुमारे ८ वाजता ओंकारेश्वर येथे पोहोचले. दि. २९ ऑक्टोबर रोजी ओंकारेश्वर येथे नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला आणि दि. ३१ ऑक्टोबर रोजी नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्याने पश्चिम दिशेने पायी परिक्रमेस सुरुवात केली. या यात्रेत त्यांच्या सोबत तालुक्यातील बाळसमुद्र येथील हरे मामा व सुलजगावचे बाळासाहेब किंगरे हेही सहभागी झाले होते.
ओंकारेश्वर येथून बडवानी, शुलपाणी जंगल असा दर कोस दर मुक्काम प्रवास करत १४ नोव्हेंबर रोजी रामकुंड-बुलबुलकुंड येथे ते पोहोचले. तेथून गोल्डन ब्रिज, बिगलेश्वर मार्गे नर्मदेच्या पश्चिमेकडील समुद्राला मिळणाऱ्या खम्मतकी खाडी – रेवा सागर संगम येथे पोहोचले. रेवासागर संगम येथे नावेतून सागरातून वळसा घालून त्यांनी नर्मदेच्या पश्चिमोत्तर भागातून उत्तर किनाऱ्याने पूर्वेकडील दिशेने परिक्रमा पुढे सुरू ठेवली.
उत्तर किनाऱ्यावरील पौडी, भरूच, महेश्वर, नर्मदा सागर, हेठाघाट, नर्मदा कुंड मार्गे ते अमरकंटक येथे नर्मदेच्या उगमस्थानी पोहोचले. त्यानंतर पुन्हा वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्यावर येत डिंडोरी, त्रिवेणी संगम, होशंगाबाद मार्गे परिक्रमा पूर्ण करत दि. १५ जानेवारी २०२६ रोजी ते पुन्हा ओंकारेश्वर येथे पोहोचले. तेथे पूजाअर्चा करून दि. १६ जानेवारी रोजी साखरखेर्ड्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.
दि. १७ जानेवारी रोजी साखरखेर्डा येथे पोहोचताच त्यांनी प्रथम भोगावती नदी किनाऱ्यावरील महाकालेश्वर शंभूमहादेव येथे अभिषेक करून भावपूर्ण पूजन केले. त्यानंतर बुंधेलपूरा येथील मा. जगदंबा देवीचे पूजन व आरती करून गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या संपूर्ण यात्रेदरम्यान विविध ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी अंथरूण-पांघरूण, भोजन व वैद्यकीय सुविधांची उत्तम व्यवस्था होती, अशी माहिती भुजपालसिंग यांनी दिली. ते दररोज सरासरी ३५ ते ४५ किलोमीटर पायी चालत असत. एकूण ३६०० किलोमीटर अंतराची ही नर्मदा परिक्रमा त्यांनी ७९ दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण केली.

