Cable Thieves Wreak Havoc :पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शेत शिवारात विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

विद्युत पंपाच्या तारांवर डल्ला; रब्बी पिकांसमोर पाणीटंचाईचा धोका
संजय तायडे
बोरगाव मंजू : पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शेत शिवारात विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
बोरगाव मंजूत बाजार समिती परिसर,गजानन महाराज मंदिर परिसरात थांबणार बस
याबाबत प्रदीप भिमराव छबीले (रा. सुकळी नंदापुर) यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गावालगत असलेल्या शासकीय तलावातून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी सबमर्सिबल पंप बसविण्यात आला होता. पाण्याच्या पातळीनुसार पंपाला जोडलेली पट्टी केबल वाढविण्यात येत होती.
२१ मार्च रोजी सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तलावावर गेले असता पंपाला जोडलेली सुमारे ४ हजार फूट लांबीची केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. पाहणीअंती अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी केबल कापून चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेत केवळ छबीले यांच्याच नव्हे, तर गावातील इतर शेतकरी—ज्ञानेश्वर जवंजाळ, शरद पवार, गणेश छबीले, शरद छबीले, सुरेखा सारसे, गजानन छबीले, देवलाल सारसे व रमेश सारसे—यांच्या पंपांच्या केबल्सही चोरीस गेल्याचे समोर आले आहे. सर्व मिळून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता केबलचा कोणताही मागोवा लागला नाही. दरम्यान, या प्रकारामुळे शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

