Benefit of revenue services : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ उद्या ७ मार्चपासून सुरू होत आहे. हे अभियान १५ मे २०२६ पर्यंत तालुक्यातील विविध महसूल मंडळांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बबन इंगळे
बार्शीटाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ उद्या ७ मार्चपासून सुरू होत आहे. हे अभियान १५ मे २०२६ पर्यंत तालुक्यातील विविध महसूल मंडळांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार आणि मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार आपार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच बार्शीटाकळीचे तहसीलदार रवींद्र कापशीकर यांच्या देखरेखीखाली महसूल विभागाची लोकाभिमुख सेवा अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत दोनद खुर्द, पिंजर, धाबा, पुनोती बुद्रूक, महान आणि बार्शीटाकळी या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील विविध चुका दुरुस्त करणे, संगणकीकृत स्वाक्षरी असलेले सातबारा व आठ-अ उताऱ्यांचे वितरण, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संगणकीकृत स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देणे यांसारख्या सेवा दिल्या जाणार आहेत.
याशिवाय अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, लक्ष्मी मुक्ती योजना, एकल महिला शिबिर, रेती परवाना वाटप, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरकुलासाठी पट्टे वाटप, इलेक्ट्रॉनिक मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक आणि प्रधानमंत्री किसान नोंदणी यांसह अनेक महसुली सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांबाबत आवश्यक पत्रके तयार करून गाव दप्तरे अद्ययावत करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
शिबिरांदरम्यान आरोग्य तपासणी, पशुवैद्यकीय तपासणी तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अतुल सोनवणे, नायब तहसीलदार अक्षय नागे, गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

