Bee attack :पातूर तालुक्यातील चान्नी बसस्थानक परिसरात गुरुवारी (५ मार्च) सकाळच्या सुमारास आगेमोह मधमाश्यांच्या हल्ल्यात एका ५५ वर्षीय इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. मात्र जवळील विद्यालयातील शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.

शिक्षकांनी धाव घेत वाचविले प्राण; पांगऱ्याकडे जाताना झाला मधमाशांचा हल्ला
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील चान्नी बसस्थानक परिसरात गुरुवारी (५ मार्च) सकाळच्या सुमारास आगेमोह मधमाश्यांच्या हल्ल्यात एका ५५ वर्षीय इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. मात्र जवळील विद्यालयातील शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.
गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथील जयंत झा (वय ५५) हे काही कामानिमित्त पांगरा येथे गौरक्षणाच्या कामासाठी आले होते. ते चान्नी बसस्थानकाजवळील रस्त्याने जात असताना अचानक आगेमोह मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते जीव वाचवण्यासाठी धावत धावत जवळील जय बजरंग विद्यालयाजवळ आले; मात्र धावताना ते रस्त्यावर कोसळले.
ही घटना विद्यालयातील शिक्षकांच्या निदर्शनास येताच मुख्याध्यापक संग्राम इंगळे, शिक्षक एस.आर. गोपनारायण, शिपाई दयाराम शेगोकार, अनिल इंगळे तसेच माजी पंचायत समिती सदस्य भास्कर तायडे यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जखमी इसमाच्या अंगावर कपडे टाकून त्यांना खाली झोपविले तसेच जवळील कचऱ्याच्या गंजीला आग लावून धूर निर्माण करून मधमाश्या पळवून लावल्या.
दरम्यान, जखमी व्यक्तीच्या शरीरावर सुमारे १५० ते २०० मधमाश्यांनी डंख मारल्याचे दिसून आले. त्यानंतर अनिल इंगळे यांनी आपल्या चारचाकी वाहनातून त्यांना चातारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविले. या प्रसंगी शिक्षक व स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

