Water stagnation : बुलढाणा तालुक्यातील भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने विद्यार्थी व अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळा परिसरात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेत
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यातील भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने विद्यार्थी व अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
शाळेत दररोज शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील बालकांना या अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. परिसरात वाढलेले गवत, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पालकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने शाळा व अंगणवाडी परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, स्वच्छता मोहीम राबवावी, वाढलेले गवत हटवून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. बोरकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. शाळा परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी संरक्षण भिंतीला आवश्यक त्या ठिकाणी छिद्र पाडण्याबाबत तसेच वाढलेल्या गवतावर राऊंडअपची फवारणी करण्याबाबत ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.”
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता संबंधित विभागाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

