Lineman Statue :महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अकोला येथील विद्युत भवनात लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मान; दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी वितरण
बुलढाणा : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरणच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अकोला येथील विद्युत भवनात लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर लाईनमन पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अधीक्षक अभियंता दीपक सोनोने, सहाय्यक महाव्यवस्थापक मनीष भोपळे, कार्यकारी अभियंते अजितपालसिंह दिनोरे, धीरज चव्हाण, शशांक पोंक्षे तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य अभियंता राजेश नाईक म्हणाले, “लाईनमन हा खऱ्या अर्थाने प्रकाशदूत असून प्रतिकूल परिस्थितीतही तो अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असतो. त्यामुळे लाईनमन हा महावितरणचा कणा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुतळा उभारण्यात आल्याचा अभिमान वाटतो.”
ते पुढे म्हणाले, “वीज ही अत्यावश्यक सेवा असून ग्राहकांचे समाधान हेच अंतिम ध्येय आहे. अडचणींवर मात करत सेवेत सातत्य राखणे हीच खरी जबाबदारी आहे.” ‘गुणवंत कामगार’ पुरस्कारासाठी निवड झालेल्या ४५ कर्मचाऱ्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील १४, बुलढाणा जिल्ह्यातील २३ आणि वाशिम जिल्ह्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये यंत्रचालक व तंत्रज्ञांचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, परिमंडळातील २१ दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार दुचाकी वाहन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ६ दुचाकींचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण शेलकर यांनी केले. सूत्रसंचालन संजय पुरकर यांनी केले, तर आभार सुरेंद्र क्षीरसागर यांनी मानले.

