Severe Water Scarcity in Lohara :तालुक्यातील लोहारा गावात गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे, तापत्या उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 200 रुपयांना पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या गंभीर प्रशासनाकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची रोष व्यक्त केला आहे.

१४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या परिसरातच भीषण पाणीटंचाई; 200 रुपयांना विकत घ्यावे लागते पाणी
जाकीर अहमद
बाळापूर : तालुक्यातील लोहारा गावात गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे, तापत्या उन्हात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 200 रुपयांना पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या गंभीर प्रशासनाकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची रोष व्यक्त केला आहे.
गावात पाणीटंचाईची इतकी बिकट अवस्था झाली आहे की, २०० लिटर पाण्यासाठी नागरिकांना तब्बल २०० रुपये मोजावे लागत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले असून त्यांनी पाणी विकत घ्यावे की घरासाठी अन्नाची व्यवस्था करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पाणीटंचाईचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षण बाजूला ठेवून कडक उन्हात पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
मन नदीवर कवठा गावाजवळ कोट्यवधी रुपये खर्च करून बांध बांधण्यात आला, मात्र गेल्या चार वर्षांपासून त्या बांधात पाणीच अडवले गेले नाही. त्यामुळे हा बांध फक्त दिखाव्यासाठीच बांधण्यात आला का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या उन्हाळ्याच्या काळात बहुतेक गरीब नागरिकांकडे रोजगारही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पाण्यासाठी पैसे खर्च करणे त्यांच्यासाठी अधिक कठीण झाले आहे. दरम्यान, गावची ग्रामपंचायत सध्या निलंबित (सलाई) अवस्थेत असल्याने प्रशासनिक व्यवस्था पूर्णपणे रामभरोशावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोहारा ग्रामपंचायतीला सध्या कोणताही संरक्षक नाही, त्यामुळे गरीब जनतेच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर पाणीटंचाईकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा गावाची पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

