dead monkey : तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभात शुक्रवार, दि. १७ मार्च रोजी मृत वानर आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच गावाला झाला होता पाणीपुरवठा; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
जाकीर अहमद
बाळापूर : तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभात शुक्रवार, दि. १७ मार्च रोजी मृत वानर आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जलकुंभाचे फाटक उघडे राहिल्यामुळे वानर आत पडून मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, वानराचा मृत्यू नेमका कधी झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले असताना अशा प्रकारची निष्काळजी समोर येणे धक्कादायक आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी एस. जी. बोंडे यांनी जलकुंभाची स्वच्छता करूनच पुढील पाणीपुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या घटनेमुळे जलसाठ्यांच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस?
जलकुंभाचे फाटक उघडे राहिल्याने त्यात पडून वानराचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्याला नोटीस देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बोंडे यांनी दिली.
प्रशासनाची हलगर्जी; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
जलकुंभात शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृत वानर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वानर नेमके कधी जलकुंभात पडले, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वीच गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच जलकुंभ स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. जलकुंभाची स्वच्छता पूर्ण केल्यानंतरच पुढील पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गावकऱ्यांना दवंडी देऊन माहिती देण्यात येणार असून, पाणी न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
— एस. जी. बोंडे, ग्रामविकास अधिकारी, खिरपुरी बुद्रुक

