Schools in Vidarbha :राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील तीव्र उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तेथील शाळा २२ जून २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासून नियमितपणे सुरू होतील.

उन्हाच्या झळांमुळे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: विदर्भातील शाळांना आठवडाभराची अतिरिक्त मुदत
पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील तीव्र उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन तेथील शाळा २२ जून २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासून नियमितपणे सुरू होतील.
शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार विदर्भातील शाळांना अतिरिक्त आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. विदर्भात अद्यापही तापमानाचा पारा उच्चांकी स्तरावर असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्य शासनाने यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विदर्भातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, पुणे आणि अन्य संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्द्यांचा विचार करून शिक्षण विभागाने सुधारित निर्णय जाहीर केला.
विदर्भातील शाळांसाठी विशेष नियम
२२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत विदर्भातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. त्यानंतर १ जुलै २०२६ पासून शाळांचे नियमित वेळापत्रक लागू होईल.
हा निर्णय राज्य मंडळाच्या सर्व शाळांना लागू राहणार असून विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अद्यापही त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तेथील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू राहतील.
या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा निर्णय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

