Sarthak from Dhad : धाड येथील सार्थक नितीन जयस्वाल या विद्यार्थ्याने महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT-CET) 2026 परीक्षेत 99.99 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे धाड गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिद्द, मेहनत आणि नियोजनाने मिळविले यश
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : धाड येथील सार्थक नितीन जयस्वाल या विद्यार्थ्याने महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT-CET) 2026 परीक्षेत 99.99 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे धाड गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
MHT-CET ही राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि स्पर्धात्मक परीक्षा मानली जाते. अशा परीक्षेत 99.99 पर्सेंटाइल मिळवणे ही अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जाते. सार्थकने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे.
सार्थकचे वडील नितीन जयस्वाल हे धाड येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. मुलाच्या या यशामुळे जयस्वाल कुटुंबात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाळेतील शिक्षकांनीही सार्थकच्या यशाचे कौतुक करत त्याच्या मेहनतीची आणि अभ्यासातील सातत्याची प्रशंसा केली आहे.
यशाबद्दल बोलताना सार्थकने आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष आभार मानले. नियमित अभ्यास, योग्य दिशा आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर कोणतेही लक्ष्य गाठता येते, असा संदेशही त्याने विद्यार्थ्यांना दिला.
भविष्यात अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन देशासाठी आणि समाजासाठी योगदान देण्याचा मानस सार्थकने व्यक्त केला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो, याचे उत्कृष्ट उदाहरण त्याने घालून दिले आहे.
धाड गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने यशाची परंपरा कायम ठेवली असून सार्थक जयस्वालच्या या दैदिप्यमान यशाने त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण धाड गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

