Residents of Gharkul relieved: आयटीआय-घरकुल परिसरातील रहिवाशांना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भेडसावत असलेल्या सांडपाणी (सीवरेज) वाहिनीच्या गंभीर समस्येचा अखेर अंत झाला आहे. बंद पडलेल्या वाहिनीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक नगरसेवक नासिर हुसैन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नगरसेवक नासिर हुसैन यांच्या पाठपुराव्याला यश; आयटीआय-घरकुल परिसरातील सीवरेज समस्या अखेर निकाली
जाकीर अहमद शेख
बाळापूर: आयटीआय-घरकुल परिसरातील रहिवाशांना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भेडसावत असलेल्या सांडपाणी (सीवरेज) वाहिनीच्या गंभीर समस्येचा अखेर अंत झाला आहे. बंद पडलेल्या वाहिनीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक नगरसेवक नासिर हुसैन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक नासिर हुसैन यांनी नगर परिषद प्रशासनाशी समन्वय साधत सलग तीन दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबविली. त्यांच्या देखरेखीखाली नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन ते चार फूट खोदकाम करून बंद पडलेली सांडपाणी वाहिनी मोकळी केली. त्यामुळे साचलेल्या घाण पाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
घरकुल क्रमांक ७३१, ७४७, ७५०, ७५१ आणि ७५२ मधील रहिवाशांनी या कामाचे स्वागत केले. अयाज शाह, गौस खान, इम्रान खान, शेख इब्राहिम आणि मोहम्मद फुझैल यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून घरासमोर साचणारे घाण पाणी आणि दुर्गंधीमुळे कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. लहान मुलांना घराबाहेर खेळणेही कठीण झाले होते. पावसाळा तोंडावर आल्याने साथीच्या रोगांची भीतीही वाढली होती.
वाहिनी मोकळी झाल्यानंतर परिसरातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून दुर्गंधी नाहीशी झाली आहे. परिसरात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले पुन्हा आनंदाने खेळताना दिसत आहेत.
स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक नासिर हुसैन यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी केवळ तांत्रिक समस्या सोडवली नाही, तर अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या कुटुंबांना दिलासा आणि निरोगी वातावरण मिळवून दिले. जनप्रतिनिधींनी संवेदनशीलता आणि बांधिलकीने नागरिकांच्या समस्या हाताळल्यास कोणतीही अडचण दूर होऊ शकते, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले.
नागरिकांच्या मते, अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या निराकरणामुळे जनहिताच्या समस्यांवर गांभीर्याने काम केल्यास सकारात्मक बदल घडवून आणता येतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या कामामुळे आयटीआय-घरकुल परिसरातील अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून स्वच्छता व आरोग्याबाबत नवी आशा निर्माण झाली आहे.

