Publication of the book : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील १३८ स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचा इतिहास उजेडात आणणाऱ्या ‘सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्य कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन शिक्षणाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे उत्साहात पार पडले. प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून केला आहे.

प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर
बुलढाणा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील १३८ स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचा इतिहास उजेडात आणणाऱ्या ‘सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्य कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन शिक्षणाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे उत्साहात पार पडले. प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून केला आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन बुलढाणा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी पी. टी. क्षीरसागर, अधीक्षक आशिष वाघ, अधीक्षक वर्ग-दोन पी. टी. खुळे तसेच डॉ. नंदकुमार बोकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘प्रतिसरकार’ या ऐतिहासिक पर्वाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनानंतर सातारा आणि सांगली परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, बाबूजी पाटणकर, जी. डी. बापू लाड, बर्डे गुरुजी, आप्पासाहेब लाड आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरोधात समांतर सरकारची स्थापना करण्यात आली होती. १९४२ ते १९४६ या काळात प्रतिसरकारने ब्रिटिश राजवटीला मोठे आव्हान उभे केले होते.
या काळात गावगुंड, सावकार आणि ब्रिटिशधार्जिण्या शक्तींविरोधात प्रतिसरकारने प्रभावी लढा उभारला. अनेक क्रांतिकारकांनी भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. हुतात्मा किसन अहिर, हुतात्मा नानकसिंग, हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे, हुतात्मा विष्णू बारपटे, हुतात्मा रविशंकर पंड्या यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले.
प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के यांनी या ग्रंथातून विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागमय इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. “स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, इतिहासप्रेमी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

