Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पातूर तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच अकोला जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साताऱ्यात अकोला जिल्ह्याचा गौरव; पातूर तालुक्याला उत्कृष्ट कामगिरीचा राज्यस्तरीय पुरस्कार
राहुल सोनोने
दिग्रस बुद्रुक : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पातूर तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच अकोला जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री Shivraj Singh Chouhan, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हे, तालुके तसेच सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतींचा राज्यस्तरीय गौरव करण्यात आला. त्यामध्ये अकोला जिल्ह्याला राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अकोट तालुक्यातील बेलोरा बुद्रुक ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, उत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये पातूर तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून विशेष यश संपादन केले. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, तत्कालीन प्रकल्प संचालक मनोज जाधव, विद्यमान प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष काळे, अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमाकांत माळी तसेच बेलोरा बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच राम मंगळे आणि ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर बिडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी, नियोजनबद्ध कामकाज, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनहिताची बांधिलकी यामुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामविकास यंत्रणा, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयपूर्ण कार्याची ही गौरवशाली पावती मानली जात आहे. या यशाबद्दल संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

