Mahatma Gandhi Bhavan :ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देऊळगाव राजा नगरीत महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत महात्मा फुले चौकातील नगरपालिकेच्या नूतन इमारतीला ‘महात्मा गांधी भवन’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गांधीवादी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे अभिनंदन करण्यात आले.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देऊळगाव राजा नगरीत महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत महात्मा फुले चौकातील नगरपालिकेच्या नूतन इमारतीला ‘महात्मा गांधी भवन’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गांधीवादी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे अभिनंदन करण्यात आले.
देऊळगाव राजा शहराला स्वातंत्र्य चळवळीचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे. कमिटी चौकात स्वातंत्र्यानंतर प्रथम ध्वजारोहण करण्यात आले होते, ही ऐतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे. याच परिसरातील जुन्या इमारतीत पूर्वी नगरपालिकेचा कारभार चालत होता. पुढे नगरपालिका नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी वाचनालय सुरू करण्यात आले होते. जनतेच्या मागणीनुसार या वाचनालयाला स्वातंत्र्यसैनिक ज. वा. काळे यांचे नाव देण्यात आले होते.
दरम्यान, वाचनालयाची इमारत जीर्ण झाल्यानंतर या ठिकाणी नव्याने भव्य इमारत उभारण्यात येत आहे. या नव्या वास्तूला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव देऊन येथे गांधी स्मारक उभारण्याची मागणी सर्वोदय मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लताताई राजपुत यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी सकारात्मक निर्णय घेत कमिटी चौकातील या नव्या इमारतीला ‘महात्मा गांधी भवन’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून निवेदनकर्त्यांनी मोकळ यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष शांतीलाल सिंगलकर यांनी “हे गांधी भवन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि गांधीजींच्या विचारांचा वारसा जिवंत ठेवेल,” असे भावनिक उद्गार काढले. तर उपस्थित मान्यवरांनी गांधी विचार समाजात रुजवण्याची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या निर्णयामुळे देऊळगाव राजाच्या ऐतिहासिक परंपरेत आणखी एक मूल्यवर्धन झाले असून, शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळणार आहे.

