sexual exploitation : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावरच लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बाळापूर परिसरात भाड्याने राहत असलेल्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘रक्षणकर्ताच भक्षक?’ बाळापूरात पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणीच्या शोषणाचा आरोप
बाळापूर : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावरच लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बाळापूर परिसरात भाड्याने राहत असलेल्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी हा पीडितेच्या कुटुंबाच्या घरात भाड्याने राहत होता. याच काळात त्याने घरमालकाच्या मुलीशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मात्र त्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे.
लग्नासाठी वारंवार आग्रह करूनही नकार मिळाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पाडघन यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे पोलीस विभागातील शिस्त, नैतिकता आणि जबाबदारी याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. समाजात कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवरच अशा स्वरूपाचे आरोप होत असल्याने जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, अलीकडील काळात पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित काही वादग्रस्त घटनाही समोर आल्याने विभागाच्या सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपास करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

