Horrific accident : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ शुक्रवारी पहाटे दोन मालवाहू वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रेलर चालक केबिनमध्ये अडकला होता. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर ट्रकचालकांनी दाखविलेल्या समयसूचकता, धाडस आणि माणुसकीमुळे त्याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना घडली.

माणुसकीचा महामार्ग! १०-१२ ट्रकचालकांनी एकत्र येत चालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले
मेहकर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ शुक्रवारी पहाटे दोन मालवाहू वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रेलर चालक केबिनमध्ये अडकला होता. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर ट्रकचालकांनी दाखविलेल्या समयसूचकता, धाडस आणि माणुसकीमुळे त्याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर क्रमांक एमएच ४६ डीसी ११५२ चे चालक वसीम अहमद (वय ४०, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे नागपूरहून मुंबईकडे जात होते. पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्रमांक २८७.२०० जवळ त्यांच्या पुढे असलेल्या आयशर ट्रक (एमएच ४० डीसी ३९११) चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या ट्रेलरची जोरदार धडक बसली.
अपघात इतका भीषण होता की ट्रेलरच्या केबिनचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि चालक वसीम अहमद केबिनमध्ये अडकून पडले. जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने तात्काळ आपले वाहन थांबवून मदतीचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने इतर वाहनचालकांनाही मदतीसाठी पाचारण केले.
काही क्षणांतच १० ते १२ ट्रकचालकांनी आपली वाहने थांबवून बचावकार्यात सहभाग घेतला. सर्वांनी मिळून युद्धपातळीवर प्रयत्न करत केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे व त्यांच्या पथकासह मेहकर पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला तातडीने ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सकाळी साडेसहापर्यंत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली होती.
या घटनेत ट्रकचालकांनी दाखविलेली माणुसकी आणि सहकार्याची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली असून, “रस्त्यावरचे खरे हिरो” म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

