Friends provide support : शिंदी येथील शेतकरी सुनील उत्तमराव खरात यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण प्रसंगी सुनील यांच्या वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत कुटुंबाला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली आहे.

साखरखेर्डा : शिंदी येथील शेतकरी सुनील उत्तमराव खरात यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण प्रसंगी सुनील यांच्या वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत कुटुंबाला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली आहे.
शिंदी येथील शेतकरी सुनील उत्तमराव खरात यांनी १२ जानेवारी रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनील हे कष्टकरी शेतकरी असून शेतीवर मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आईच्या नावावर असलेले बँकेचे कर्ज सातत्याने वाढत गेल्याने ते आर्थिक विवंचनेत अडकले होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परिणामी घरखर्च चालविणे अवघड झाले होते.
सुनील हे विद्यार्थी दशेत अत्यंत हुशार होते. बुलढाणा येथे उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होती. याच काळात त्यांचे अनेक सहाध्यायी पुढे शासकीय सेवेत दाखल झाले. मात्र वडिलांचे अकस्मात निधन झाल्यानंतर घरातील कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सुनील यांच्यावर आली. कालांतराने आईचेही निधन झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेती करत कुटुंबाचा संसार चालविला.
त्यांच्या दुःखद निधनाची बातमी सहाध्यायांना कळताच सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सुहास पाटील (जानेफळ), संजय जाधव (लव्हाळा), अर्जुन मोरे (खामगाव), अनिरुद्ध टेकाळे (चिखली), समाधान सुगंधाने (सावंगिवीर), सुनील तेलंग (मोताळा), सुरेश खिल्लारे (उमनगाव), ॲड. मनोहर तायडे (नांदुरा), प्रा. के. ओ. शिंगणे (बुलढाणा), विजय पवार (बुलढाणा), सुभाष विश्वनाथ गवई (अँटी करप्शन विभाग, मुंबई), विनोद खिल्लारे, रुस्तुम चव्हाण, उज्वला चव्हाण, नितीन वायाळ तसेच सरपंच अशोक खरात यांनी एकत्र येत ३ फेब्रुवारी रोजी शिंदी येथे कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी मित्रांनी केवळ मदतीपुरते न थांबता, सुनील यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या वसतिगृहात हे सर्व विद्यार्थी एकत्र वास्तव्यास होते. समाजातील प्रत्येकाने आपापली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा प्रसंगी पुढे आले, तर अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना निश्चितच आधार मिळू शकतो, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

