Deplorable condition : मेहकर आणि चिखली तालुक्यांना जोडणाऱ्या जानेफळ–अमडापूर या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. धूळ आणि चिखलाने भरलेल्या या रस्त्यावरून दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शालेय विद्यार्थी व नागरिक आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

रस्ता रखडला, विद्यार्थ्यांचे हाल वाढले; आंदोलनाचा इशारा
हिवराखुर्द : मेहकर आणि चिखली तालुक्यांना जोडणाऱ्या जानेफळ–अमडापूर या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. धूळ आणि चिखलाने भरलेल्या या रस्त्यावरून दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शालेय विद्यार्थी व नागरिक आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
जानेफळ ते अमडापूर या सुमारे १८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नामांकित ठेकेदाराकडे कामाची जबाबदारी दिल्याने दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.
ऑक्टोबर २०२५ मध्ये कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला कामाचा वेग समाधानकारक असल्याने पावसाळ्यापूर्वी किमान एका बाजूचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, संपूर्ण रस्ता उखडल्यानंतर कामाचा वेग अचानक मंदावला आणि त्यानंतर काम कासवगतीने सुरू राहिले.
उन्हाळ्यात उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागला. रस्त्यावर नियमित पाणी शिंपडण्याची व्यवस्था नसल्याने धुळीचे लोट उडत होते. यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली.
दरम्यान, रस्त्यावरील डी.एल.सी.चे काम काही काळ पूर्णपणे बंद पडले होते. काम बंद पडण्यामागे ठेकेदाराची बिले थकीत असल्याची चर्चा होती, तर काही नागरिकांनी राजकीय हस्तक्षेप आणि कमिशनच्या वादामुळे काम रखडल्याचा आरोप केला. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यानंतर जून २०२६ मध्ये मेहकर तालुक्यातील जानेफळकडून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोज धूळ आणि चिखलातून प्रवास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे गणवेश शाळेत पोहोचेपर्यंत मळकट होत आहेत. दुचाकी वाहनचालकांना घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून, प्रवास धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कामाचा वेग वाढविण्यासोबतच धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी शिंपडण्याची व्यवस्था करावी आणि पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीसाठी तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास शालेय विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

