Chain Hunger Strike :शहरातील रेल्वे स्थानक परिसरात उभारलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेविरोधात मातंग समाज आक्रमक झाला असून, बुधवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे शहरात सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आंदोलनाची ठिणगी; व्यापारी संकुलाला नाव देण्याचीही मागणी
खामगाव : शहरातील रेल्वे स्थानक परिसरात उभारलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेविरोधात मातंग समाज आक्रमक झाला असून, बुधवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे शहरात सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.
स्मारक समितीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात पुतळ्याचे तातडीने सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. आंदोलकांच्या मते, साहित्यरत्नाच्या पुतळ्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असून शासनाने विशेष निधी उपलब्ध करून सुशोभीकरणाची कामे त्वरित हाती घ्यावीत.
याचबरोबर नगरपालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलाला ‘अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल’ असे नामकरण करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या मागणीमुळे आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी लखन सोनोने, कृष्णा नाटेकर, आशू खंडारे, चेतन इंगळे आणि अर्जुन कासारकर यांनी सहभाग घेत आंदोलनाची धुरा सांभाळली. “प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, पुढील काही दिवसांत या प्रश्नावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

