Buldhana Zilla Parishad : आगामी काळातील ग्रामीण राजकारण आणि विकासाच्या दिशेला आकार देणारा बुलढाणा जिल्हा परिषदेचा ४१ कोटी २३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अखेर सामान्य सभेत मंजूर करण्यात आला. प्रशासनाने हा अर्थसंकल्प “समतोल व सर्वसमावेशक” असल्याचा दावा केला असला, तरी विविध योजनांमधील निधी वाटपामुळे राजकीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.

बुलढाणा : आगामी काळातील ग्रामीण राजकारण आणि विकासाच्या दिशेला आकार देणारा बुलढाणा जिल्हा परिषदेचा ४१ कोटी २३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अखेर सामान्य सभेत मंजूर करण्यात आला. प्रशासनाने हा अर्थसंकल्प “समतोल व सर्वसमावेशक” असल्याचा दावा केला असला, तरी विविध योजनांमधील निधी वाटपामुळे राजकीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी अर्थसंकल्प सादर केला, तर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांनी त्यास अंतिम मंजुरी दिली. या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण (२०%), महिला व बाल कल्याण (१०%), देखभाल-दुरुस्ती (२०%), दिव्यांग कल्याण (५%) यांसारख्या घटकांसाठी ठरावीक निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. मात्र, या वाटपामागे स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार झाला का, यावरही चर्चा रंगू लागली आहे.
विभागनिहाय तरतुदीत बांधकाम (६.७३ कोटी), पंचायत (४.३१ कोटी), ग्रामीण पाणीपुरवठा (४.०५ कोटी) आणि शिक्षण (३.५८ कोटी) या प्रमुख विभागांना मोठा वाटा देण्यात आला आहे. यामुळे पायाभूत सुविधा आणि ग्रामीण सेवा सुधारण्यावर भर देण्याचा प्रयत्न दिसतो.
दरम्यान, ‘सीईओ संग्राम योजना’, ‘मिशन ZEDD’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोचिंग, तसेच विधवा व एकल महिलांसाठी अनुदान, बायोगॅस योजना अशा विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोच साधण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आल्याने विविध समाजघटकांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. यामुळे आगामी स्थानिक राजकीय वातावरणावर या अर्थसंकल्पाचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, विकासाचा अजेंडा पुढे करताना सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसत असला, तरी त्यामागील राजकीय गणिते आणि अंमलबजावणीची प्रभावीता यावरच यश अवलंबून राहणार आहे.

