MLA Manoj Kayande : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केले आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केले आहे.
स्वर्गीय अजीत पवार यांना अभिवादन करून सुरू करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पीय मांडणीत राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडेही विशेष लक्ष देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील रस्ते विकास हा अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला असून गावागावांना काँक्रेट रस्त्यांनी जोडण्याचा शासनाचा संकल्प भविष्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले. या माध्यमातून गावातील दळणवळण सुलभ होईल, शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. तसेच केंद्र शासनाने लागू केलेले चार नवीन लेबर कोड राज्यात लागू करण्याची घोषणा करून ऐतिहासिक पाऊल उचलल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी म्हटले आहे.
याशिवाय सामाजिक न्याय, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि शेतीसंबंधित विविध योजनांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देत केलेल्या या तरतुदींमुळे आगामी काळात गावोगावी प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल, असा विश्वास आमदार कायंदे यांनी व्यक्त केला.
एकूणच हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

