dispute : सायकलच्या व्यवहारातील उर्वरित ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणासह त्याच्या काकाला मारहाण करण्यात आल्याची घटना सावखेड भोई येथे घडली. फिर्यादी तरुणाला सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्यालाही दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चार नामनिर्देशित आरोपींसह पाच अनोळखी इसमांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेड भोईतील वाद पेटला; चार जणांसह पाच अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : सायकलच्या व्यवहारातील उर्वरित ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणासह त्याच्या काकाला मारहाण करण्यात आल्याची घटना सावखेड भोई येथे घडली. फिर्यादी तरुणाला सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्यालाही दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चार नामनिर्देशित आरोपींसह पाच अनोळखी इसमांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगेश दिलीप राऊत (वय ३३, व्यवसाय मजुरी, रा. अंबिका नगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या काकांचा आरोपी शुभम किशोर डोंगरे याच्यासोबत सायकलच्या व्यवहारावरून काही दिवसांपूर्वी व्यवहार झाला होता. या व्यवहारातील ५०० रुपये बाकी असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला.
दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास सावखेड भोई येथे आरोपींनी उर्वरित पैशांच्या कारणावरून फिर्यादीच्या काकाला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
काकाला मारहाण होत असल्याचे पाहून मंगेश राऊत हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही या वादात लक्ष्य करण्यात आले. तक्रारीनुसार, आरोपी शुभम डोंगरे व त्याच्यासोबत असलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला गाडीत बसवून भिवगाव येथे नेले.
भिवगाव येथे आरोपी शुभम किशोर डोंगरे, किशोर उत्तम डोंगरे, अशोक उत्तम डोंगरे, आतिष गणेश वाघमारे तसेच पाच अनोळखी इसमांनी एकत्र येऊन फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपी शुभम डोंगरे याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ काचेची बाटली मारल्याने ते जखमी झाले. तसेच एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या पाठीवर पट्ट्याने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी फिर्यादीला जीवे मारण्याची अथवा गंभीर परिणामांची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मंगेश राऊत यांच्या तोंडी तक्रारीवरून कायमी अप क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.

