A Solution to Water Scarcity :तालुक्यातील शेतकरी आणि पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या गावांसाठी दिलासा देणारा निर्णय अखेर प्रत्यक्षात उतरला आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत संत चोखा सागर (खडकपूर्णा प्रकल्प) येथून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातील गेट क्रमांक १ आणि १९ सुमारे १० सेंटीमीटरने उघडून अंदाजे २.३७५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश; खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्याने ४० गावांना दिलासा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील शेतकरी आणि पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या गावांसाठी दिलासा देणारा निर्णय अखेर प्रत्यक्षात उतरला आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत संत चोखा सागर (खडकपूर्णा प्रकल्प) येथून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातील गेट क्रमांक १ आणि १९ सुमारे १० सेंटीमीटरने उघडून अंदाजे २.३७५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
या निर्णयामुळे परिसरातील टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, नारायणखेड, डिग्रस, साठेगाव, हिवरखेड, राहेरी, खैरव, बारलिंगा, देवखेड यांसह सुमारे ४० गावांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असताना विहिरींचा जलस्तर झपाट्याने घटत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत नदीपात्रात पाणी सोडल्याने विहिरींचा जलस्तर वाढण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय या पाण्यामुळे पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासोबतच उन्हाळी पिकांसाठीही मोठा आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार मनोज कायंदे यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा निर्णय शक्य झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाणी सोडण्याच्या वेळी तुषार शिपने, विष्णु झोरे, गजानन काकड, सदाशिव मुंडे, सुनील शेजुळकर, विकास कासारे, संतोष डोके, गजानन दराडे, समाधान डोके, सचिन आंधळे, विकास आंधळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी (जलसंपदा) सौरभ तेल्हार आणि धरण विभागातील कर्मचारी यांचीदेखील उपस्थिती होती. खडकपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

