The message of peace :पवित्र ईद-उल-अज़हा (बकरी ईद) निमित्त गुरुवारी बाळापूर शहरात धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले. पहाटेपासूनच शहरातील मशिदी, ईदगाह आणि गल्लीबोळांमध्ये ईदची रौनक पाहायला मिळाली. सर्वत्र अमन, बंधुभाव, प्रेम, त्याग आणि मानवतेचा संदेश घुमत होता.

ज़ाकिर अहमद
बाळापूर : पवित्र ईद-उल-अज़हा (बकरी ईद) निमित्त गुरुवारी बाळापूर शहरात धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले. पहाटेपासूनच शहरातील मशिदी, ईदगाह आणि गल्लीबोळांमध्ये ईदची रौनक पाहायला मिळाली. सर्वत्र अमन, बंधुभाव, प्रेम, त्याग आणि मानवतेचा संदेश घुमत होता.
खामगाव रोड, शेगाव-पळसी जुनी चौफुली परिसरातील नवीन ईदगाह येथे सकाळी 6:40 वाजता मुफ़्ती हनीफ यांनी प्रभावी बयान करत कुर्बानीचे धार्मिक महत्त्व, त्यागाची भावना, मानवसेवा आणि सामाजिक ऐक्य यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित नागरिकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश रुजला.
यानंतर सकाळी 7:35 वाजता मौलवी बरकत यांच्या नेतृत्वाखाली ईद-उल-अज़हाची नमाज अदा करण्यात आली. या वेळी हजारो मुस्लिम बांधवांनी देशात अमन, शांती, सुख-समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी अल्लाह तआलाकडे विशेष दुआ केली. नवीन ईदगाहमध्ये अंदाजे 3 ते 4 हजार नागरिकांची उपस्थिती होती. या प्रसंगी काँग्रेसचे गटनेते मोहम्मद अकरम, डॉ. मोहम्मद फैय्याज़, हाजी राशिद कुरेशी यांच्यासह विविध उलेमा, समाजसेवक आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते. पत्रकार ज़ाकिर अहमद यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनीही ईदगाहमध्ये उपस्थित राहून नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नमाजनंतर मौलाना रियाजोद्दीन यांनी विशेष दुआ करत मुस्लिम समाजाच्या इबादत, कुर्बानी आणि नेक अमल कबूल व्हावेत अशी प्रार्थना केली. तसेच संपूर्ण जगात शांतता, सौहार्द आणि समृद्धी नांदो, अशी दुआ करण्यात आली. यावेळी मौलाना हाफिज मोहम्मद रिजवान यांनी खुतबा सादर केला.
दरम्यान, ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 8 वाजता देखील ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यात आली. शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदचा सण शांततापूर्ण आणि सामूहिक वातावरणात साजरा केला. नमाजेची इमामत व खुतबा खतीब सय्यद नातीकुद्दीन आणि खतीब सय्यद ऐनुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उलेमा-ए-कराम यांनी आपल्या संदेशातून स्वच्छता, शिस्त, सामाजिक सलोखा आणि परस्पर प्रेम जपण्याचे आवाहन केले. ईद-उल-अज़हाच्या या पवित्र सणातून समाजात त्याग, ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. ईद-उल-अज़हाचा हा पवित्र सण बाळापूरमध्ये धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे सुंदर प्रतीक ठरला.

