700 tribal women :जीवनाच्या खडतर वाटेवर कष्टाशिवाय पर्याय नसलेल्या आदिवासी समाजातील कुटुंबांसाठी महिलांचे श्रम हेच मोठे भांडवल ठरत आहे. उदरनिर्वाहासाठी पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत मेहनत करणाऱ्या या महिलांनी आता गोळंबी व्यवसायातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील आदिवासीबहुल १५ ते २० गावांमधील सुमारे ७०० आदिवासी महिला बिबे फोडून गोळंबी काढण्याच्या व्यवसायात कार्यरत असून त्या आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्या आहेत.

जागतिक महिला दिन विशेष
बबन इंगळे
बार्शीटाकळी : जीवनाच्या खडतर वाटेवर कष्टाशिवाय पर्याय नसलेल्या आदिवासी समाजातील कुटुंबांसाठी महिलांचे श्रम हेच मोठे भांडवल ठरत आहे. उदरनिर्वाहासाठी पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत मेहनत करणाऱ्या या महिलांनी आता गोळंबी व्यवसायातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील आदिवासीबहुल १५ ते २० गावांमधील सुमारे ७०० आदिवासी महिला बिबे फोडून गोळंबी काढण्याच्या व्यवसायात कार्यरत असून त्या आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्या आहेत.
महसूल सेवांचा लाभ गावागावात : बार्शीटाकळीत महाराजस्व शिबिरांना प्रारंभ
या व्यवसायामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांना घरगुती पातळीवर जोडधंद्याची संधी मिळाली आहे. दिवसाभराच्या कष्टातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यासोबतच मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह आणि शेतीसाठी आवश्यक गुंतवणूकही करत आहेत. त्यामुळे या महिलांचे योगदान कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पूर्वी अडाणी व निरक्षर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांमध्ये आता मोठा बदल दिसून येत आहे. आज त्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. मजुरी, शेती आणि विविध गृहउद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परिणामी, अनेक मुलांनी उच्च शिक्षण घेत शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्येही स्थान मिळवले आहे.
गोळंबी व्यवसायासाठी लागणारा बिब्याचा कच्चामाल छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड या राज्यांतून तालुक्यात आणला जातो. हा कच्चा माल आदिवासीबहुल गावांमध्ये पोहोचवला जातो. त्यानंतर महिलांकडून बिबे फोडून त्यातून गोळंबी काढण्याचे काम केले जाते. तयार झालेली गोळंबी नंतर मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जाते. विशेषतः हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये या व्यवसायाला मोठी गती मिळते.
बिबे फोडताना महिलांना सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. बिब्यांमधील तेल अंगावर उडू नये किंवा त्याची वाफ शरीराला लागू नये यासाठी त्या हात, पाय आणि चेहऱ्यावर घट्ट संरक्षणात्मक साहित्याचा वापर करतात. या सर्व खबरदारीसह त्या अत्यंत कौशल्याने हे काम पार पाडतात.
पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला हा व्यवसाय आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम होत आहे. गोळंबी व्यवसायासोबतच शेती क्षेत्रातही या आदिवासी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करताना दिसतात. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून जागतिक महिला दिनानिमित्त या महिलांची प्रेरणादायी कहाणी समाजासाठी आदर्श ठरत आहे.

