Raimulkars attack:मेहकर-लोणार तालुक्यात ५ हजार २०० कोटी रुपयांची विकासकामे आपल्या प्रयत्नातून मंजूर झाली असून, गेल्या सव्वा वर्षात आमदार सिद्धार्थ खरात यांनी मंजूर करून आणलेले एखादे ठोस काम असल्यास ते जाहीर करावे, असे थेट आव्हान माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिले.

मेहकर-लोणारमध्ये विकासावरून श्रेयवादाची ठिणगी; रायमुलकरांचे खरातांना खुले आव्हान
मेहकर : मेहकर-लोणार तालुक्यात ५ हजार २०० कोटी रुपयांची विकासकामे आपल्या प्रयत्नातून मंजूर झाली असून, गेल्या सव्वा वर्षात आमदार सिद्धार्थ खरात यांनी मंजूर करून आणलेले एखादे ठोस काम असल्यास ते जाहीर करावे, असे थेट आव्हान माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिले.
भरधाव बसने दुचाकीस उडवले, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी
मेहकर येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यातील महायुती सरकारच्या सहकार्याने ही कामे मंजूर झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
९३२ कोटींची कामे मेहकर शहरात
मेहकर शहरात ९३२ कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली असून बहुतांश कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात असल्याचे रायमुलकर यांनी सांगितले. सिमेंट व डांबरी रस्ते, सभामंडप, स्मशानभूमी, आरोग्य व शिक्षण सुविधा, सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्ते आणि विविध बांधकामे यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील दहा कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत, सहा कोटी रुपयांची विद्यार्थी अभ्यासिका, पावणेचार कोटी रुपयांचे पोलीस स्टेशन भवन, दहा कोटी रुपयांचा डीपी रोड, सव्वातीन कोटी रुपयांचे वारकरी भवन, बालाजी मंदिर परिसरातील आठ कोटी रुपयांची कामे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक संकुलाचे सहा कोटी रुपयांचे काम आणि शिवाजी महाराज उद्यानातील साडेआठ कोटी रुपयांची विकासकामे आपल्या कार्यकाळात मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. शिवाजी उद्यानात १ कोटी १० लाख रुपयांचा आकर्षक पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
श्रेयवादावरून आरोप
आपण मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार खरात व त्यांच्या समर्थकांकडून होत असल्याचा आरोप करत “आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम बंद करावे,” असा टोला रायमुलकर यांनी लगावला. कामांची पाहणी करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
पाणीपुरवठा योजनांचा उल्लेख
मेहकर शहरासाठी ११२ कोटी रुपयांच्या पेनटाकळी प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, पूर्ण झाल्यानंतर दररोज पाणीपुरवठा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. लोणार शहरातील पाणीपुरवठा योजनेचे कामही गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानेच विकासकामे गतीने मार्गी लागली, असा दावा त्यांनी केला. मेहकर नगरपालिकेत बहुमत आमच्याकडे असल्याने निर्णय बहुमतानेच होतील, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जयचंद बाठिया, प्रा. विनोद पह्राड, अमोल कंकाळ, विलास मोहरुत, समाधान साबळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या

