marriage certificate :देव-देवता तसेच राष्ट्रपुरुष हे भारतीय समाजाच्या श्रद्धा, संस्कार आणि मूल्यव्यवस्थेचे केंद्रबिंदू मानले जातात. मात्र अलीकडच्या काळात लग्न पत्रिकांवर देव-देवतांसह महापुरुषांची छायाचित्रे छापण्याची प्रथा वाढत असून, विवाह सोहळ्यानंतर या पत्रिका अडगळीत टाकल्या जाणे किंवा कचऱ्यात फेकल्या जाण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. यामुळे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिमांची अवहेलना होत असल्याची तीव्र भावना समाजात निर्माण झाली असून, या प्रथेविरोधात आता समाजातून लोकचळवळीची गरज व्यक्त होत आहे.

मयूर गोलेच्छा
लोणार : देव-देवता तसेच राष्ट्रपुरुष हे भारतीय समाजाच्या श्रद्धा, संस्कार आणि मूल्यव्यवस्थेचे केंद्रबिंदू मानले जातात. मात्र अलीकडच्या काळात लग्न पत्रिकांवर देव-देवतांसह महापुरुषांची छायाचित्रे छापण्याची प्रथा वाढत असून, विवाह सोहळ्यानंतर या पत्रिका अडगळीत टाकल्या जाणे किंवा कचऱ्यात फेकल्या जाण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. यामुळे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिमांची अवहेलना होत असल्याची तीव्र भावना समाजात निर्माण झाली असून, या प्रथेविरोधात आता समाजातून लोकचळवळीची गरज व्यक्त होत आहे.
या विषयावर गेल्या काही काळापासून सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक आणि विविध संघटनांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. “श्रद्धा जपायची असेल, तर तिचा सन्मानही राखला गेला पाहिजे,” या भूमिकेतून लग्न पत्रिकांवर देव-देवता व महापुरुषांचे फोटो छापू नयेत, अशी ठाम मागणी पुढे येत आहे. ही मागणी केवळ एका घटकापुरती मर्यादित न राहता समाजव्यापी लोकचळवळीचे स्वरूप घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी अगरबत्तीच्या पुड्यांवर छापले जाणारे देव-देवता व महापुरुषांचे फोटो अवहेलना होत असल्याच्या कारणावरून बंद करण्यात आले होते. समाजाने हा बदल सहज स्वीकारला आणि तो आज एक आदर्श ठरला आहे. त्याच धर्तीवर आता विवाह पत्रिकांबाबतही सामूहिक निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मत जाणकारांकडून मांडले जात आहे.
लग्न पत्रिका ही काही दिवसांपुरती असते; मात्र देव-देवता आणि महापुरुषांचे स्थान शाश्वत असते. त्यामुळे या श्रद्धास्थानांचा वापर अल्पकालीन साहित्यावर करणे कितपत योग्य आहे, यावर समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. देव-देवतांचे नामस्मरण मंगल श्लोक, स्तोत्रे किंवा शुभ वचनांद्वारे करता येऊ शकते. तसेच महापुरुषांचे विचार, बोधवाक्य अथवा प्रेरणादायी संदेश छापून त्यांना खरा सन्मान देता येईल, असेही जाणकार सांगतात.
या विषयावर सामाजिक माध्यमांवरही जनजागृती सुरू झाली असून अनेक तरुण, महिला आणि कुटुंबांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. काही ठिकाणी “लग्न पत्रिकेवर फोटो नको, विचार हवेत” अशी भूमिका घेऊन नवविवाहित जोडप्यांनी समाजासमोर सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, यासाठी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
देव-देवतांसह महापुरुषांचा सन्मान हा केवळ प्रतिमांपुरता मर्यादित नसून तो आचरणातून व्यक्त व्हायला हवा. त्यामुळे लग्न पत्रिकांवरील फोटो छापण्याची प्रथा थांबवून श्रद्धेचा खरा अर्थ जपण्याची ही चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समाजाने एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय भविष्यात अधिक संस्कारशील, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

