PM Kisan installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातील सुमारे ३०,१८,३६१ शेतकऱ्यांची बँक खाती ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आधारशी संलग्न नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून, या शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केवायसी न केल्याने बसणार फटका; २२ व्या हप्त्याचे होणार लवकरच वितरण
नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरातील सुमारे ३०,१८,३६१ शेतकऱ्यांची बँक खाती ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आधारशी संलग्न नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून, या शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने आधार-बँक खाते संलग्नता अनिवार्य केल्याने हप्त्याच्या वितरणावर थेट परिणाम होत आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सुमारे १० लाख शेतकऱ्यांची खाती उत्तर प्रदेशात आधारशी लिंक नाहीत, तर महाराष्ट्रात १,७२,३४८ शेतकरी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत.
शेतकऱ्यांना बँक खाते आधारशी जोडण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. संबंधित बँकेच्या नेटबँकिंग संकेतस्थळावर लॉग इन करून ‘आधार सीडिंग/अपडेट’ पर्याय निवडता येतो. मोबाईल बँकिंग अॅपमधूनही आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येते. काही बँका थेट यूआयडीएआय पोर्टलच्या माध्यमातूनही आधार संलग्नतेची सुविधा देतात.
आधार लिंक नसल्यास काय परिणाम?
बँक खाते आधारशी जोडले नसल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होत नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार-सीडिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने राज्य आणि केंद्र स्तरावर याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

