2,872 Cases Disposed : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात तब्बल २ हजार ८७२ प्रकरणांचा समेटाने निपटारा करण्यात आला असून, एकूण ९ कोटी ३७ लाख ७८ हजार ५३० रुपयांची तडजोड झाली.

लोकन्यायालयातून न्यायाला गती; हजारो प्रकरणे समेटाने निकाली
अकोला : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात तब्बल २ हजार ८७२ प्रकरणांचा समेटाने निपटारा करण्यात आला असून, एकूण ९ कोटी ३७ लाख ७८ हजार ५३० रुपयांची तडजोड झाली.
जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये एकूण ११ हजार ३९८ प्रकरणे लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ३५८ प्रलंबित प्रकरणे आणि १ हजार ५१८ दाखलपूर्व प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले. या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद, मोटार वाहन अपघात प्रकरणे, कलम १३८ एन.आय. अॅक्ट अंतर्गत प्रकरणे, ग्रामपंचायत घरपट्टी-पाणीपट्टी तसेच बँकांच्या कर्जवसुलीशी संबंधित प्रकरणांचा समावेश होता.
लोकन्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली काही कौटुंबिक प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे, आपसी सहमतीने घटस्फोटासाठी आलेल्या तीन दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात पती-पत्नीमधील अनेक वर्षांचा वाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी प्रभारी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दि. शं. दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील, विधी स्वयंसेवक तसेच विविध शासकीय विभागांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
लोकन्यायालयाच्या माध्यमातून वाद समोपचाराने मिटवले जात असल्याने समाजात सकारात्मक संदेश जात असून, न्यायप्रक्रियेला गती मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

