Women from Agar : गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत असून खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. शेतातील मशागतीची कामेही ठप्प झाली असल्याने पावसासाठी विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगर येथील पेठपुरा भागातील महिलांनी पारंपरिक श्रद्धेनुसार मरीआईला साकडे घालत मोर्णा नदीचे जल आणून जलाभिषेक केला.

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी महिलांची अनोखी प्रार्थना; आगरमध्ये जलाभिषेक व शोभायात्रा
आगर : गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत असून खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. शेतातील मशागतीची कामेही ठप्प झाली असल्याने पावसासाठी विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगर येथील पेठपुरा भागातील महिलांनी पारंपरिक श्रद्धेनुसार मरीआईला साकडे घालत मोर्णा नदीचे जल आणून जलाभिषेक केला.
शनिवार, १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास महिलांनी वाजत-गाजत मोर्णा नदीच्या पात्रातून कलशात जल भरले. त्यानंतर डोक्यावर जलाचे कलश घेऊन गावातील प्रमुख मार्गांवरून भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला, लहान मुले तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सायंकाळी मरीआई मंदिरात मोर्णा नदीचे जल अर्पण करून देवीचा जलाभिषेक करण्यात आला. यावेळी डफाच्या तालावर पारंपरिक गीते गात वरुणराजाला प्रसन्न होण्यासाठी महिलांनी प्रार्थना केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पिकांना जीवनदायी पावसाची नितांत गरज असून शेतकऱ्यांच्या आशा आता वरुणराजाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पावसासाठी धार्मिक परंपरांनुसार विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा जलाभिषेक करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर पेठपुरा भागातील बजरंगबली मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिला, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पावसासाठी केलेल्या या सामूहिक प्रार्थनेमुळे परिसरात धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

