Wishes of unity : पवित्र ईद-उल-अजहाच्या निमित्ताने गुरुवारी बाळापुर शहरात श्रद्धा, उत्साह, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. शहरातील छोटी शाही मशीद तसेच विविध मशिदी आणि ईदगाहांमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष नमाज अदा केली. देशात अमन, शांती, सुख-समृद्धी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अल्लाहकडे विशेष दुआ मागण्यात आल्या.

ईद-उल-अजहानिमित्त बाळापुरात गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन
ज़ाकीर अहमद
बाळापुर : पवित्र ईद-उल-अजहाच्या निमित्ताने गुरुवारी बाळापुर शहरात श्रद्धा, उत्साह, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. शहरातील छोटी शाही मशीद तसेच विविध मशिदी आणि ईदगाहांमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष नमाज अदा केली. देशात अमन, शांती, सुख-समृद्धी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अल्लाहकडे विशेष दुआ मागण्यात आल्या.
नमाजनंतर छोटी शाही मशीद परिसरात सामाजिक सलोखा आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले. विविध समाज, धर्म आणि घटकांतील नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. यावेळी बाळापुरातील मान्यवर हाजी रहमान कुरेशी, आसिफ शाह, इमरान कुरेशी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी गजानन महाराज पुरी यांनीही उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. “समाजात प्रेम, शांतता आणि परस्पर सन्मानाची भावना टिकून राहणे हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे,” असे सांगत त्यांनी सर्व धर्मीयांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान, बाळापुर पोलीस प्रशासनानेही उत्सवात सक्रिय सहभाग घेत नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली. पोलीस अधिकारी झोडगे, गुप्तचर विभागाचे रवि राऊत तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या संवेदनशील आणि सकारात्मक भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले.
ईद-उल-अजहाच्या या मंगलमय वातावरणात बाळापुरात धर्म, जात आणि समाजाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे सुंदर दर्शन घडले. विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत प्रेम, आपुलकी आणि ऐक्याचा संदेश दिला. “बाळापुरची खरी ओळख म्हणजे येथील परस्पर प्रेम, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
संपूर्ण शहरात दिवसभर आनंद, उत्साह आणि भाईचाऱ्याचे वातावरण कायम होते. ईदचा हा पवित्र सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता समाजातील हृदये जोडणारा आणि मानवतेचा संदेश देणारा ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली.

