jewelry theft : विवाहसोहळे, बाजारपेठ किंवा प्रवासादरम्यान अंगावर सोन्याचे दागिने घालून जाणाऱ्या महिलांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साखरखेर्डा पोलीस ठाणे हद्दीत २९ जानेवारी रोजी घडलेल्या प्रकारानंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांपासून बचावासाठी जागरूकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अशोक इंगळे
साखरखेर्डा : विवाहसोहळे, बाजारपेठ किंवा प्रवासादरम्यान अंगावर सोन्याचे दागिने घालून जाणाऱ्या महिलांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साखरखेर्डा पोलीस ठाणे हद्दीत २९ जानेवारी रोजी घडलेल्या प्रकारानंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांपासून बचावासाठी जागरूकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका वयोवृद्ध महिलेशी गोड बोलून ओळख वाढविणाऱ्या संशयित महिलेने तिच्या घरातील परिस्थिती, अंगावरील दागिन्यांची खरी-खोटी माहिती जाणून घेतली. संबंधित महिला आठवडी बाजारांमध्ये फिरत राहून दागिने घातलेल्या महिलांशी संवाद साधत माहिती मिळविते आणि संधी साधून गळ्यातील पोत किंवा मौल्यवान वस्तू लंपास करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी साखरखेर्डा आठवडी बाजारात जीवन गवई यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची पोत अशाच प्रकारे चोरीला गेल्याची घटना घडली होती. बाजारपेठेत पाकिटमारी, मोबाईल चोरी यांसारखे प्रकारही वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
चोरटे महिलांची वैयक्तिक माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्या साथीदारांच्या मदतीने पाठलाग करून चोरी किंवा घरफोडी करण्याचे प्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, प्रवासात व गर्दीत दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, तसेच दागिन्यांच्या खरेदीच्या पावत्या सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. चोरी झाल्यानंतर पोलिसांकडून पावतीची मागणी केली जाते; ती नसल्यास तक्रार प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
दरम्यान, सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढून प्रती तोळा सुमारे दीड ते दोन लाखांच्या घरात पोहोचल्याने दागिन्यांचे आर्थिक मूल्यही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे “जे आहे ते जपण्यासाठी सावधगिरी हाच सर्वोत्तम उपाय” असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

