Villagers aggressive : सिंदखेड राजा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीत मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याचे पाणी, साचलेल्या गटारी, दुर्गंधी आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्यांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर ८ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मात्र, यापूर्वीही आश्वासनांपलीकडे काहीच न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबाबत साशंकतेचे वातावरण कायम आहे.

लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित, ग्रामस्थांमध्ये मात्र साशंकता
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीत मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याचे पाणी, साचलेल्या गटारी, दुर्गंधी आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्यांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर ८ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मात्र, यापूर्वीही आश्वासनांपलीकडे काहीच न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबाबत साशंकतेचे वातावरण कायम आहे.
१७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीडमध्ये विकासकामांच्या बाबतीत “शून्य कारभार” असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, ठिकठिकाणी साचलेल्या गटाऱ्यांमधून सुटणारी दुर्गंधी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्याच्या नावाखाली गावातील पक्के रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यावर साधा मुरूम टाकण्याचीही तसदी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
या विविध समस्यांकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने डोळेझाक होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली होती. मात्र, त्यातून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने गाव अजूनही विकासाच्या मूलभूत सोयींपासून वंचित असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर ६ एप्रिल रोजी ग्रामस्थ आणि महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
धक्कादायक बाब म्हणजे, दोन दिवस या उपोषणाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा अधिकाऱ्यांच्या कानावर गेल्यानंतरच सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांगर यांना जाग आली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी पत्र तयार करून उपोषणस्थळी भेट दिली. काही मध्यस्थी ग्रामस्थांच्या सहकार्याने पंचायत समिती प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन देत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ८ एप्रिल रोजी उशिरा उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र, या वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता होणार का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही आंदोलनानंतर केवळ वेळ मारून नेण्यासाठी आश्वासने देण्यात आली, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी भावना गावात व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अजूनही संशयाचे सावट कायम आहे.

