Uddhav Senas anger : 28 निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसेल, तर अशा यंत्रणेचा काय उपयोग?” असा संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी शनिवारी भरपावसात अकोला-अकोट महामार्गावरील गांधीग्राम येथे रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनातून जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

200 कोटी खर्चूनही मृत्यूचा सापळा कायम’ : आमदार नितीन देशमुखांचा महामार्ग प्रशासनावर हल्लाबोल
अकोला : “28 निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसेल, तर अशा यंत्रणेचा काय उपयोग?” असा संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी शनिवारी भरपावसात अकोला-अकोट महामार्गावरील गांधीग्राम येथे रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनातून जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांच्या मते, जवळपास नऊ वर्षे आणि सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च करूनही अकोला-अकोट तसेच देवरी फाटा-शेगाव सिमेंट रस्ता आजही “मृत्यूचा सापळा” ठरत आहे. रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे काम, ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, खचलेले काँक्रीट आणि अपुरी दुरुस्ती यामुळे वारंवार अपघात होत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या पार्श्वभूमीवर अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अभियंत्यांसोबत आमदार नितीन देशमुख यांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती आंदोलनादरम्यान देण्यात आली. या बैठकीत महामार्गाच्या दुरुस्ती, जबाबदारी निश्चिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे आंदोलन आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनात जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, दिलीप बोचे, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुका प्रमुख संजय भांबेरे, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), राहुल कराळे (अकोला पूर्व), मनपा गटनेता विजय इंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, माजी जि.प. सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांच्यासह शेकडो शिवसैनिक, ग्रामस्थ आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अपूर्ण रस्त्यावर टोलची तयारी; संतापाचा उद्रेक
रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसताना अकोला-अकोट मार्गावर टोल वसुलीसाठी शेड आणि इमारती उभारण्याची तयारी सुरू असल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “नागरिकांना सुरक्षित रस्ता देता आला नाही, पण टोल वसुलीची घाई कशासाठी?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. रस्ता दुरुस्त होण्यापूर्वी टोलवसुलीचा प्रयत्न म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका करण्यात आली.
पावसातच भेगा बुजवण्याचा ‘देखावा’
आंदोलनाची माहिती मिळताच सकाळपासून अकोला ते गांधीग्रामदरम्यान रस्त्यावरील भेगा सिमेंटने बुजवण्याची लगबग सुरू झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मात्र भरपावसात टाकलेले सिमेंट काही वेळातच वाहून गेल्याने या दुरुस्तीचा फोलपणा उघड झाला. आंदोलनकर्त्यांनी याला “दुरुस्तीचा देखावा” असे संबोधत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे सातत्याने अपघात होत असताना प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे केवळ दुरुस्तीचे आश्वासन न देता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई, रस्त्याची त्वरित व दर्जेदार दुरुस्ती, तसेच अपघातग्रस्त मार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

