Rohit Chavan :जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण बार्शीटाकळी तालुक्यातील रोहित शंकर चव्हाण याने घालून दिले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या या विद्यार्थ्याने कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय बारावीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के गुण मिळवत आपल्या आश्रम शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

परिस्थितीवर मात; शिकवणीशिवाय रोहितचा ८०% गुणांसह यशाचा झेंडा
बबन इंगळे
बार्शीटाकळी : जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण बार्शीटाकळी तालुक्यातील रोहित शंकर चव्हाण याने घालून दिले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या या विद्यार्थ्याने कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय बारावीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के गुण मिळवत आपल्या आश्रम शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
साखरविरा या काटेपूर्णा अभयारण्यालगत असलेल्या दुर्गम गावातील रोहितचे कुटुंब अल्पभूधारक असून, मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. घरातील आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासाठी विशेष सुविधा नसतानाही रोहितने हार मानली नाही. वस्तीगृहात राहून तो दररोज मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत राहिला. मर्यादित साधनसामग्रीतूनही त्याने वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास याच्या जोरावर हे यश मिळवले.
रोहितचे हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून, संघर्षातून उभ्या राहिलेल्या स्वप्नांची ही जिद्दीची कहाणी आहे. कुटुंबीयांच्या कष्टांचे मोल जाणून त्याने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि ध्येयासमोर ती लहान ठरते, हे त्याने सिद्ध केले.
त्याच्या या यशाबद्दल जनता ज्ञानोपासक मंडळाचे अध्यक्ष अविनाश पवार, सचिव सतीश पवार, प्राचार्य अनिल धोत्रे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. रोहितच्या यशामुळे शाळेचा आणि गावाचा मान उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.रोहितची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आणि परिस्थितीवर मात करण्याची तयारी ठेवली, तर यश निश्चित मिळते, हा संदेश त्याच्या यशातून मिळतो. आता पुढील शिक्षणातही तो अशीच प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

