mangoes has become a rarity :गत काही वर्षात तालुक्यासह परिसरात गावरान आंब्याची चव दुर्मिळ होत असल्याचे चित्र आहे. शेतकरी संकरीत आंब्याची लागवड करीत असल्याने गावरान आंब्याची आमराई आता नामशेष होत आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर गावराण आम्रवृक्षांची तोड करून संकरित व कलम केलेल्या जातींची लागवड वाढल्याने पारंपरिक आंब्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

देऊळगाव राजा तालुक्यात चित्र चिंताजनक; जतनाची गरज व्यक्त
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गत काही वर्षात तालुक्यासह परिसरात गावरान आंब्याची चव दुर्मिळ होत असल्याचे चित्र आहे. शेतकरी संकरीत आंब्याची लागवड करीत असल्याने गावरान आंब्याची आमराई आता नामशेष होत आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर गावराण आम्रवृक्षांची तोड करून संकरित व कलम केलेल्या जातींची लागवड वाढल्याने पारंपरिक आंब्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी गावागावांत शेताच्या बांधावर शेकडो गावराण आंब्याची झाडे नैसर्गिकरीत्या उभी असायची. मात्र, अधिक उत्पादन आणि जलद फळधारणा मिळवण्यासाठी शेतकरी संकरित आंब्याकडे वळले. परिणामी शेंदऱ्या, शेप्या, कबड्या, चांदण्या यांसारख्या गावराण जाती हळूहळू लुप्त होत आहेत. गावराण आंब्याच्या आमरसाची अस्सल चव आता क्वचितच अनुभवायला मिळते.
पूर्वी उन्हाळ्यात प्रत्येक घरात आमरस-पोळी ही खास मेजवानी असायची. आज मात्र बाजारातून १०० ते १५० रुपये किलो दराने आंबे विकत घेणे अपरिहार्य झाले आहे. शेजारील जिल्ह्यांतून येणारा गावराण आंब्याचाही पुरवठा घटल्याने स्थानिक बाजारपेठेत त्याची कमतरता जाणवत आहे.
गावागावात होत्या सामायिक आमराया
पूर्वी वादळी वाऱ्यानंतर पडलेले आंबे गोळा करण्यासाठी लहान मुले पिशव्या घेऊन आमरायांकडे धाव घेत. गव्हाचे काड व भुसा वापरून आंबे पिकवले जात आणि काही दिवसांतच ते नैसर्गिकरीत्या पिकून गोड चव देत. मात्र, आज ही परंपरा लोप पावत चालली आहे.
“पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गावराण आंब्याची झाडे असल्यामुळे पाहुणचारासाठी आमरस सहज उपलब्ध होत असे. आता झाडे नष्ट झाल्याने संकरित आंब्यावर अवलंबून राहावे लागते, मात्र त्याला ती चव नाही.”
विजय दंदाले, खल्याळगव्हाण
“उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांचे मामाच्या गावाला जाणे आणि गावराण आंब्याचा आस्वाद घेणे ही परंपरा होती. आता झाडेच उरली नसल्याने हा आनंद हरवला आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा गावराण आंब्याची लागवड करणे गरजेचे आहे.”
रंगनाथ बुरकुल, सावंगी टेकाळे
“अवैध वृक्षतोड आणि जुन्या झाडांची कत्तल यामुळे गावराण आंबा नामशेष होत आहे. बाजारातील संकरित आंबे कृत्रिमरीत्या पिकवले जात असल्याने ते आरोग्यासही घातक ठरू शकतात. त्यामुळे गावराण आंब्यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.”
दिनकरराव शिंदे, शेतकरी

