Speeding Two-Wheeler :तालुक्यातील जामवसु-धाबा मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

रस्ता ओलांडताना अपघात; नागपूरमध्ये शेतकऱ्याने गमावला जीव
बबन इंगळे
बार्शीटाकळी : तालुक्यातील जामवसु-धाबा मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
जामवसु येथील शेतकरी किसन विठोबा वसु (वय ५५) हे १६ मार्च रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास धामणदरी फाटा येथील प्रवासी निवाऱ्याजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच-३०-बीटी-३५०३ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकी चालक निखिल संजय राठोड याने निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वसु यांना तातडीने अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाचे भाऊ भगवान विठोबा वसु यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

