Congress Takes Aggressive :तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना थेट इशारा दिला आहे. पातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

बाळापूर/पातूर : तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना थेट इशारा दिला आहे. पातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
तालुकाध्यक्ष राजेश गावंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला धारेवर धरत, खरीप हंगामातील नुकसानीबाबत शासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला. अतिवृष्टी व ढगफुटीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. शासनाने जाहीर केलेली प्रति हेक्टर १७ हजार रुपयांची मदत आणि पिकविमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. “शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, तात्काळ मदत जमा करा,” अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडली. याशिवाय, शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाकडे लक्ष वेधत संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणीही जोरदारपणे पुढे करण्यात आली. कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी करत काँग्रेसने प्रशासनाला थेट सवाल केला. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनाही गॅस टंचाईचा मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एलपीजी गॅसचा अनियमित पुरवठा आणि वाढते दर यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी सीसीआय आणि नाफेडमार्फत कापूस, सोयाबीन, हरभरा व तूर खरेदी हमीभावाने सुरू ठेवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी जिल्हा सरचिटणीस अतुल पाटील अमानकर, काँग्रेस नेते शब्बीर भाई, शहराध्यक्ष शेख मुक्तार अहमद, भीमराव कोथळकर, माजी सभापती दौलतराव घुगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला आणि शेतकरी उपस्थित होते. “शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा थेट इशारा काँग्रेसने प्रशासनाला दिला आहे.

