Shortage of teachers : बुलढाणा तालुक्यात मे-जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने आणि अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, पालकांचा कल खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत असल्याचे चित्र आहे.

समायोजन प्रक्रियेला विरोधामुळे जिल्हा परिषद शाळा अडचणीत? गटशिक्षणाधिकाऱ्यांचा शिस्तभंग कारवाईचा इशारा
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यात मे-जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने आणि अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, पालकांचा कल खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत असल्याचे चित्र आहे.
भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषद शाळा या समस्येचे ठळक उदाहरण ठरत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या शाळेत १२ ते १३ शिक्षक कार्यरत होते. मात्र सध्या केवळ दोन शिक्षकांवर शाळेचा संपूर्ण कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी ग्रामपंचायतीने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव केला होता. मात्र, त्याचाही अपेक्षित परिणाम झालेला नाही.
दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत काही शिक्षकांकडून प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. मोठ्या पटसंख्येच्या आणि शिक्षकविरहित शाळांमध्ये नियुक्ती स्वीकारण्याऐवजी शहरालगतच्या किंवा कमी विद्यार्थ्यांच्या शाळांना प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते. समायोजनाचे आदेश मिळाल्यानंतर काही शिक्षकांकडून राजकीय पाठपुरावा, तक्रारी, न्यायालयीन प्रक्रिया किंवा स्थगिती मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला जात आहे.
तालुक्यात सध्या चार अतिरिक्त शिक्षक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, दुर्गम भागातील शाळांमध्ये नियुक्ती स्वीकारण्यास काही शिक्षक अनुत्सुक असल्याने रुईखेड मायंबासह अनेक गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे तातडीने समायोजन करून रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून, शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पालकांप्रमाणे आम्हालाही मुलांना खासगी किंवा कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश देण्याचा विचार करावा लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.”
— सतीश वाघमारे, उपसरपंच तथा पालक, रुईखेड मायंबा
गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांनी सांगितले की, “बुलढाणा तालुक्यात सध्या चार शिक्षक अतिरिक्त आहेत. काही शिक्षकांची बीएलओ (BLO) म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, शालेय कामकाजात अडथळे निर्माण करणे किंवा शिस्तभंगाचे वर्तन करणाऱ्या शिक्षकांची कोणतीही गय केली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”

