Farmer dies:देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद परिसरात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आळंद परिसरातील दुर्दैवी घटना; नागरिकांमध्ये हळहळ
गजानन भालेकर, धोत्रा नंदई :
देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद परिसरात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५१, रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून आळंद येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते. त्यांनी आळंद (ता. देऊळगाव राजा) येथील शेती ठोका-बटई पद्धतीने घेतली होती.
रविवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास ते शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेताच्या वरून गेलेली विजेची तार तुटून शेतात पडलेली होती. याची कल्पना नसताना त्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आळंद फाटा येथील गणपती मंदिराजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

