Sarpanch is the administrator : सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींचा कारभार विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच प्रशासक म्हणून सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

अशोक इंगळे
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींचा कारभार विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच प्रशासक म्हणून सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
पूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, २० फेब्रुवारी रोजी नव्या आदेशाद्वारे महाराष्ट्र शासन यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १५१ उपकलम (१) खंड (अ) तसेच कलम १८२ पोटकलम (१) अंतर्गत अधिकारांचा वापर करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी संबंधित आदेश जारी केले असून, पुढील सहा महिने किंवा ग्रामपंचायत निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना प्रशासक म्हणून कामकाज करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या निर्णयास राज्यपालांच्या वतीने शासन सहसचिव वर्षा भरोसे यांनीही मान्यता दिली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर यापूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नव्या आदेशामुळे साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा आदी मोठ्या ग्रामपंचायतींतील सरपंचांना पुन्हा कामकाजाची संधी मिळाली आहे.
दरम्यान, साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांना सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारून केवळ दहा महिने झाले होते. शासनाच्या नव्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गावातील रस्ते, नाली आदी विकासकामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

