Samyak Saman : महाकवी तथा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सम्यक समन्वय समितीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी एडेड हायस्कूलजवळील हुतात्मा स्मारक परिसरात त्यांच्या स्मृतीस्थळास विनम्र अभिवादन करण्यात आले.

वामनदादांच्या शाहिरीतून आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्रभर जागर
बुलढाणा : महाकवी तथा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सम्यक समन्वय समितीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी एडेड हायस्कूलजवळील हुतात्मा स्मारक परिसरात त्यांच्या स्मृतीस्थळास विनम्र अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीच्या माध्यमातून आणि समर्थ लेखणीतून महाराष्ट्राच्या घराघरांत, खेड्यापाड्यांत, वाड्या-वस्त्यांत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा त्यांच्या जीवनाचा श्वास आणि ऊर्जाकेंद्र होते.
या विचारांचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी वामनदादा कर्डक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रभर भ्रमंती केली. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या गीतांमधून सामाजिक समता, बंधुता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला.
बुलढाणा शहराजवळील भादोला या गावाशीही महाकवी वामनदादा कर्डक यांचा प्रदीर्घ सहवास राहिला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा आजही समाजमनावर कायम असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या अभिवादन कार्यक्रमाला सम्यक समन्वय समितीचे मिलिंद वानखडे, प्रेम इंगळे, मंगल मिसाळ, पी. आर. इंगळे, सु. ऊ. बावस्कर, विजय वाकोडे, सुभाष साबळे, प्रिन्स हिवाळे, भारत जाधव, अर्चना जाधव, सुजाता हिवाळे, विमल मानकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

