Prahars Bachchu Kadu :विधान परिषदेच्या ९ नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या मुदतीनंतर एकूण १० जागांसाठी १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या उमेदवारांमध्ये भाजपकडून सहा, शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून एक आणि महाविकास आघाडीकडून एका उमेदवाराचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांची निराशा; राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी
मुंबई/बुलढाणा : विधान परिषदेच्या ९ नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या मुदतीनंतर एकूण १० जागांसाठी १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या उमेदवारांमध्ये भाजपकडून सहा, शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून एक आणि महाविकास आघाडीकडून एका उमेदवाराचा समावेश आहे.
या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याला उमेदवारी मिळाली नसल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला असून, त्यांना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश केला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संख्याबळाच्या आधारे भाजपने सहा उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. या जागांवर वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, उमेदवारी जाहीर करताना स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि ज्येष्ठ नेते नाझेर काझी यांनीही प्रयत्न केले होते. काझी यांनी तर जिल्ह्यातील शिष्टमंडळासह बारामती दौरा केला होता, तरीही त्यांना संधी मिळाली नाही. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, बच्चू कडू यांनाही संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतील जिल्ह्यातील नेत्यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांची निराशा झाली.
महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला काँग्रेसने नाराजी व्यक्त करत विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. याबाबत त्यांनी सूचक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

