Path finally cleared : येथील आठवडी बाजार तलावात पाणी येण्यासाठी असलेली अडचण दूर करण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, नाल्यावरील पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तलावात पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण; साखरखेर्ड्यात पुलाच्या कामाचे भूमिपूजन
साखरखेर्डा : येथील आठवडी बाजार तलावात पाणी येण्यासाठी असलेली अडचण दूर करण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, नाल्यावरील पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तलावात पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा येथे पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली मोठी मस्जिद असून तिच्या पश्चिमेला आठवडी बाजार तलाव आहे. या तलावात पाणी येण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर परिसरातील शेतशिवारातून नैसर्गिक पाण्याची वाट होती. मात्र कालांतराने या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे व इमारती उभारल्या गेल्याने मूळ नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले. विविध ठिकाणी पाण्याचे प्रवाह वळविल्यामुळे तलावात पाणी पोहोचणे कठीण झाले होते.
तलावात पाणी पोहोचावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. माजी सरपंच दाऊद कुरेशी यांनी २०२२-२३ मध्ये पिंपळगाव सोनारा फाटा ते बसस्थानक परिसरापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी भूमिगत नाला तयार केला. तसेच अनेक अडथळे दूर करण्यात आले आणि तलावातील गाळही काढण्यात आला. मात्र मुख्य अडचण बसस्थानक परिसरातील रस्त्यावरील बुजलेल्या नाल्याची होती. या नाल्याचे खोलीकरण आणि योग्य व्यवस्था झाल्याशिवाय तलावात पाणी पोहोचणे शक्य नव्हते. दरम्यान, दुसरबीड ते अंमडापूर हा राज्य महामार्ग क्रमांक २२२ रुंदीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांतर्गत विकसित केला जात आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुरू असून विविध ठिकाणी नवीन नाल्यांची कामे करण्यात येत आहेत. मात्र बसस्थानक परिसरातील पुलाचा या कामात समावेश नव्हता.
या पुलाचा समावेश करून काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पाहणीचे निर्देश देण्यात आले. या कामासाठी अमित जाधव आणि भाजपचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
७ जून रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि रावसाहेब देशपांडे यांच्या हस्ते पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हा नाला पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी वस्तीत किंवा इमारतींकडे न जाता थेट तलावाकडे वळविले जाईल. त्यामुळे आठवडी बाजार तलावात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी अमित जाधव, सुनील जगताप, दाऊद कुरेशी, कमलाकर गवई, संतोष दसरे, सय्यद रफीक, बाबा तिवारी, कयूम मेंबर, इब्राहिम शहा, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

