anemia-free childhood : १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक ॲनिमिया जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुलांमधील वाढता रक्तक्षय हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुयोग प्रकाशराव नागरे यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी निदान आणि उपचार न झाल्यास ॲनिमिया मुलांच्या शारीरिक-मानसिक विकासावर परिणाम करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक ॲनिमिया जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुलांमधील वाढता रक्तक्षय हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुयोग प्रकाशराव नागरे यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी निदान आणि उपचार न झाल्यास ॲनिमिया मुलांच्या शारीरिक-मानसिक विकासावर परिणाम करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. नागरे यांनी एका उदाहरणाद्वारे समस्या स्पष्ट केली. पाचवीत शिकणाऱ्या एका हुशार मुलाला सतत थकवा, झोप येणे आणि चिडचिड होऊ लागली. सुरुवातीला पालकांनी आळशीपणा समजला; मात्र तपासणीत त्याचे हिमोग्लोबिन केवळ ७ ग्रॅम आढळले. ही घटना अनेक कुटुंबांचे वास्तव दर्शवणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या “Raise Your Hands for Blood Health” या संकल्पनेनुसार रक्तातील हिमोग्लोबिन शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्याची कमतरता असल्यास मुलांमध्ये थकवा, अभ्यासात लक्ष न लागणे आणि वारंवार आजारपण दिसून येते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार भारतातील ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे ६७ टक्के मुले आणि १५ ते ४९ वयोगटातील ५७ टक्के महिला ॲनिमियाने ग्रस्त आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ॲनिमिया मुक्त भारत’ अभियान राबविले असून तपासणी-उपचार-संवाद (T-3) धोरण, शाळा-अंगणवाड्यांमधून लोह-फॉलिक अॅसिड गोळ्यांचे वितरण, राष्ट्रीय जंतनाशक दिन आणि फोर्टिफाईड तांदूळ यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत.
तथापि, ॲनिमिया केवळ लोहाच्या कमतरतेमुळे होत नाही, याकडेही डॉ. नागरे यांनी लक्ष वेधले. व्हिटॅमिन बी-१२ व फॉलिक अॅसिडचा अभाव, थॅलेसेमिया-सिकल सेलसारखे अनुवंशिक आजार, बोन मॅरो विकार, रक्ताचा कर्करोग किंवा दीर्घकालीन आजार यांमुळेही रक्तक्षय होऊ शकतो. त्यामुळे स्वतःहून औषधे देण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांनी मुलांमध्ये धाप लागणे, माती खाण्याची सवय, सतत थकवा किंवा वारंवार आजारी पडणे यांसारखी लक्षणे ओळखून साधी सीबीसी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
“सरकार प्रयत्न करत आहे; मात्र प्रत्येक पालकाने मुलांच्या रक्ताच्या आरोग्याबद्दल जागरूक होणे आवश्यक आहे. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने ‘ॲनिमिया मुक्त’ होऊ शकेल,” असा विश्वास डॉ. सुयोग नागरे यांनी व्यक्त केला.

