Outstanding success : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात श्रीमती पद्माबाई जैन इंग्रजी प्राथमिक शाळा, आलेगावने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत आलेगावच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
पातूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात श्रीमती पद्माबाई जैन इंग्रजी प्राथमिक शाळा, आलेगावने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

या परीक्षेत इयत्ता चौथीमधील १० आणि इयत्ता सातवीमधील ३ असे एकूण १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यामध्ये सानवी धाईत, मदिया नूर, सय्यद गुलाम, देवेश काळपांडे, सय्यद हसनैन अली, तोकीर बानू, शेख अल्तामेश, अरमान खान, साहिल लहामगे, अजमल अहमद, रोहन देवकर, यश चव्हरे आणि गजानन सावळे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच मुख्याध्यापक अनंता धाईत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. कविता गिले, संघपाल कांबळे, नितेश तेलगोटे, फिरोज शेख, ज्ञानेश्वर भाकरे, अजिंक्य महानकर, सुवर्णा काळपांडे, आरती नलिंदे, प्रतिभा महल्ले, रजनी राऊत, प्रीती भाकरे, ज्ञानेश्वरी इंगळे, गायत्री खराटे, स्नेहा लाहोळे आणि अंकिता काठोळे या शिक्षकांनी गेल्या आठ महिन्यांपासून विद्यार्थ्यांसाठी नियमित अतिरिक्त तास घेऊन विशेष तयारी करून घेतली.
या कालावधीत विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी, भाषा आणि परिसर अभ्यास या विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दर आठवड्याला सराव चाचण्या घेण्यात आल्या तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करता आली.
मुख्याध्यापक अनंता धाईत यांनी यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम यामुळे हे यश मिळाले आहे. इयत्ता चौथीचे १० आणि इयत्ता सातवीचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरणे ही आमच्या शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मासिक शिष्यवृत्तीमुळे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निश्चितच आर्थिक आधार मिळणार आहे.”
निकाल जाहीर होताच शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे अभिनंदन केले.

