Outrage over Water Scarcity : वाढत्या तापमानासोबतच देऊळगाव राजा शहरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पश्चिम विदर्भातील श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी म्हणून ओळख असलेल्या शहरात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याच मुद्द्यावरून स्थानिक राजकारणही तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांआड होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ १९ मे रोजी शहरातील महिला व नागरिकांनी नगरपालिकेवर आक्रमक ‘हंडा मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनाने शहरातील पाणी प्रश्नासोबतच नगरपालिकेच्या कारभारावर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

देऊळगाव राजात पाणी प्रश्नावर शहर आक्रमक; सर्वपक्षीय उपस्थितीत पालिकेला आठ दिवसांचा अल्टिमेटम
गजानन तिडके
देऊळगाव राजा : वाढत्या तापमानासोबतच देऊळगाव राजा शहरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पश्चिम विदर्भातील श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी म्हणून ओळख असलेल्या शहरात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याच मुद्द्यावरून स्थानिक राजकारणही तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांआड होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ १९ मे रोजी शहरातील महिला व नागरिकांनी नगरपालिकेवर आक्रमक ‘हंडा मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनाने शहरातील पाणी प्रश्नासोबतच नगरपालिकेच्या कारभारावर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. महिलांनी हातात रिकामे हंडे व घागरी घेऊन घोषणाबाजी करत नगरपालिकेकडे कूच केली. पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मोर्चा नगरपालिकेत पोहोचल्यानंतर महिलांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश करून घागरी फोडत आपला रोष व्यक्त केला.

या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेते सहभागी झाल्याने पाणी प्रश्नाने राजकीय स्वरूप धारण केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलकांनी जलवितरण व्यवस्थेतील त्रुटी, गळती, अनियमित पुरवठा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. नव्याने निवडून आलेल्या पालिका नेतृत्वावरही अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला.

मोर्चादरम्यान परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती. आंदोलक नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील बॅरिकेड ओलांडण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी व पोलीस पथकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टळल्याचे बोलले जात आहे.
वाढता दबाव लक्षात घेऊन नगराध्यक्ष माधुरी शिपणे, उपनगराध्यक्ष वनिता भुतडा आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शहरातील मुख्य जलवाहिनीतील गळती, तांत्रिक अडचणी व पाणी वितरणातील समस्या पुढील आठ दिवसांत मार्गी लावून टप्प्याटप्प्याने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
मात्र, विरोधी गट आणि नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, दिलेल्या मुदतीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. त्यामुळे पाणी प्रश्न येत्या काळात देऊळगाव राजाच्या स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, नागरिकांच्या मते, पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी शहरातील गळतीग्रस्त पाइपलाइन दुरुस्ती, मुख्य लाईनवरील अवैध जोडण्या बंद करणे, नियमित व अधिकृत नळजोडणीचे सर्वेक्षण, पाण्याच्या अपव्ययाविरोधात जनजागृती आणि अवैध नळजोडण्यांना वैध प्रक्रियेत आणणे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे.

